Monday, 8 July 2013

वारी, एक अनुभव...

बऱ्याच वर्षांपासून पुण्यात वारकरी बघायचो. माझा एक काका गेले खूप वर्ष आळंदी पंढरपूर अशी वारी करतो . सगळ्यात मजा  वाटायची ती त्यांना सगळेजण नमस्कार करतात ह्याची, मग ते घरातील लहान मुल असो किंवा आमची आजी. आई सांगते कि आजी तर ते आळंदीहून आले की त्यांना घरात येण्याआधी उंबऱ्यापलीकडे त्यांच्या पायावर उन पाणी घालायची आणि म्हणायची तेवढीच माउलीची सेवातर हे कायमच आकर्षण होते. जसा मोठा होत गेलो (अकलेबद्दल नाही बोलत जास्त) तसतसे वारीमधली शिस्त, त्याचे नियोजन ह्या गोष्टी ऐकत होतो. त्यामुळे हे आकर्षण कमी होता वाढतच गेले. सध्याच्या शारीरिक तंदुरुस्तीचा आलेख पाहता संपूर्ण वारी करणं जर अवघडच होते (विचारल्यावर कामाची कारणे देत होतो हा मुद्दा निराळा). पण एखादा टप्पा का करू नये असा विचार मनात घोळत होता. अखेरीस ह्या वर्षी जायचे नक्की झाले।  म्हणजे मी नक्की केले.
पालखी प्रस्थान रविवारी होते आणि आजोळघरी मुक्काम. सोमवार सकाळ अलंकापुरीहून पुण्याकडे प्रयाण. ऑफीसमध्ये बोलता बोलता असे लक्षात आले कि अजून असे काही समविचारी लोक आहेत. मग त्यांच्याबरोबर जायचे निश्चित झालेरविवारी असा निरोप आला कि जाण्यासाठी गाडी ठरवली आहे. सोमवार पहाटे :४५ ला गुड-लकला भेटायचे ठरले. बरोबर :४५ ला सगळेजण गुड-लकला होतो. सुरुवात झकास. मग सुरु झाला आळंदीसाठीचा प्रवास. विश्रांतवाडीच्या अलीकडे रस्ते बंद केले होते. त्यामुळे आम्हाला मध्येच वळायला लागले. मजल दरमजल करत, पहाटे कसाबसा रस्ता शोधत आम्ही  ला आळंदी मध्ये मरकळ रस्त्याने पोचलो आणि असे लक्षात आले कि आम्ही पालखी प्रस्थानाच्या  मिनिटे आधी आणि पालखीपासून ५० फुटावर आहोत. जे होते ते भल्यासाठी होते. आमचा सकाळच्या प्रवासाचा ताण एकदम हलका झाला. आणि पालखी प्रस्थानाची घोषणा झाली. 
वैष्णवांचा मेळा 

तिथे असलेले सर्व वारकरी माउली माउलीचा गजर करू लागले. इतका मोठा जनसमुदाय असूनही कुठेही गडबड गोंधळ नाही. सगळेजण पालखीच्या रथामागे त्याच वेगाने चालू लागले आणि चालताना विठूनामाचा गजर चालू होता. अशी गर्दी पुण्यात गणपतीच्या दिवसात असते. पण इथल्या गर्दीला एक विलक्षण शिस्त होती. त्यांच्यापैकी सगळेजण कदाचित शिक्षित नसावेत पण सुशिक्षित नक्की वाटत होते. 

आमच्या बाजूने दोन तीन लोक एकमेकांचा सदरा पकडून आपल्या दिंडीच्या दिशेने धावत होते. त्यामुळे कोणीशी त्यांच्यावर एक विचित्र नजर टाकली. ते पाहिल्यावर दुसरा एक वारकऱ्याने आमच्याशी संवाद साधला. "हे लोक गावाकडून येतात. ह्यांच्याकडे आपल्यासारखा भ्रमणध्वनी असतोच असे नाही. असला तरी ह्यांना तो वापरता येतो असे नाही. आणि मग ह्या गर्दीमध्ये ते आपल्या दिंडीपासून दूर गेले तर त्यांना तिथे परत जाणे म्हणजे खूपच कठीण काम. म्हणून हे असे एकमेकांना धरून राहणे. आपल्याला हे विचित्र वाटेल. पण हेच खरे आहे." किती पटकन आणि खरे बोलून गेला. आपण प्रत्येकजण Empathy बद्दल बोलतो. कितीजण खरच त्यांच्या भूमिकेतून विचार करतात?
त्यानंतर मजल दरमजल करत माउलीचा जयघोष करत आमची दिंडी चालू होती. हळूहळू आपण नक्की किती चाललो आहे हे प्रश्न यायला लागले होते. त्याचा रोख किती टक्के पूर्ण झाले ह्याकडे जास्त होता. तेवढ्यात आम्ही थोडे पुढे आलो जिथे वारकर्यांची सेवा म्हणून कित्येक लोक त्यांना खाण्यासाठी केळी, राजगिऱ्याच्या वड्या, खिचडी, बिस्किटाचे पुडे देत होते, तर काहीजण पाण्याची सोय करत होते. ह्यामध्ये काही स्वघोषित स्थानिक पुढारी होतेच पण कित्येक लोक कुठलाही फलक  न लावता आपली जाहिरात न करता ही सेवा करत होते आणि ह्यात उपकाराचा अभिनिवेश नसून प्रत्येक वारकर्याबद्दल अतीव आदर दिसत होता.
जाताना रस्त्यातून मधूनच एखादा ट्रक दिसायचा. त्यात काही दिंड्यामधले वारकरी आणि त्यांचे सामान दिसत होते. फोटोसाठी तो उत्तम विषय असे. मग त्या ट्रकला बाहेर अडकवलेले वारकर्यांचे कपडे असो कि टांगलेले कंदील. आपण इतक्या कमी गरजा ठेवून राहू शकतो हे इथे आल्यावरच कळते बहुतेक. आणि किती मोठा होता हा वैष्णवांचा मेळा? एकाच जागेवरून काढलेले डाव्या व उजव्या दिशेने दिसलेले हे दृश्य बघा.



शहरात आम्हाला चालता चालता (जर चाललो तर) कोणी हातात खायला दिले तर शंकेने आपण बाजूला ठेऊ. पण तिथे कोणीही हा विचार मनात न आणता चेपलं. आणि मग झाला एक चहाचा थांबा, जिथे फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि पुढे मार्गक्रमण चालू झाले. बाजूला दिंड्यांमध्ये चाललेला जयघोष, वारकरी खेळत असलेले खेळ, फुगड्या. हे फक्त अनुभवावे. म्हणूनच म्हणतो. 


तुम्ही 'बि' घडना… 

"ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम" 

1 comment: